शासकीय कार्यालयांतील भोजनाची वेळ निश्चित करणेबाबत शासनाचे आदेश


मुंबई :दिनांक ३१ ऑगस्ट, १९८८ च्या शासन निर्णयान्वये बृहन्मुंबई तसेच बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या असून कार्यालयीन वेळेत भोजनाची सुट्टी अर्ध्या तासाची असेल, ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे. तसेच दिनांक १८ सप्टेंबर, २००१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी / कर्मचारीवर्गाकरीता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी १.०० ते २.०० या दरम्यान जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ असावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि मंत्रालयाव्यतिरिक्त इतर राज्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी कार्यालयीन वेळेत भोजनाची वेळ निश्चित नसल्याने जनतेशी थेट संबंध येत असलेल्या कार्यालयांमध्ये जेव्हा लोक तक्रारी / गाऱ्हाणी / अर्ज घेऊन येतात, त्यावेळी बरेचदा संबंधित अधिकारी / कर्मचारी त्यांचे जागेवर उपलब्ध होत नाहीत. त्याबाबत विचारणा केली असता ही जेवणाची वेळ आहे, असे अभ्यागतांना सांगण्यात येते. विविध कार्यालयांमध्ये भोजनाची वेळ ही संबंधित कार्यालयाच्या सोयीनुसार ठरविली जाते. त्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. अशा तक्रारी शासनास प्राप्त झालेल्या आहेत. सबब सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत भोजनाची वेळ निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
२. तरी या परिपत्रकान्वये सूचना देण्यात येत आहेत की, राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचारीवर्गाकरीता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी १.०० ते २.०० या दरम्यान जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ असावी. भोजनासाठी अधिकारी / कर्मचारी अधिक वेळ घेणार नाहीत, तसेच एकाच शाखेतील सर्व अधिकारी / कर्मचारी एकाच वेळी भोजनासाठी जाणार नाहीत. याबाबत कार्यालय प्रमुखांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी..


३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेताक २०१९०६०७१६१६०३१६०७ असा आहे. तसेच डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page